मराठी माणसाची कर्तबगारी - भाऊचा धक्का
मुंबई कर्माला प्राधान्यदेणाऱ्या लोकांची महानगरी आहे. अशापैकींच एक होते लक्ष्मण हरिश्चन्द्र अजिंक्य ऊर्फ भाऊ (1789-1858). ते समकालीन होते इतिहासप्रसिद्ध नानाशंकरशेट, कावसजी फ्रामजी, कावसजी जहांगीर, बैरामजी जीजीभाईंचे. ज्यांचा मुंबईच्या जडण-घडणीत मोठा हात आहे. पण भाऊंची कर्तबगारी सगळ्यांवर मात करते. आता आपण त्याच कर्तबगारीचा एक आढ़ावा घेणार आहोत.
भाऊंच्या कर्तबगारीचा काळ आहे 19व्या शतकातला. महाराष्ट्राला एक मोठा समुद्र किनारा लाभला आहे त्यामुळे अठराव्या शतकात मुंबईला एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्धी लाभली. तसेतर त्याआधी पासूनच जलमार्गाने वाहतूक होते असे पण 1836 पर्यन्त माल किंवा उतारुंसाठी एक ही धक्का नव्हता विशेषकरुन कोंकण आणि गोव्याकडील जनतेचे यामुळे अतिशय हाल होत असत. त्यांचे हे कष्ट दूर करण्याकरिता पुढ़ाकार घेतला तो या भाऊ ऊर्फ भाऊरसेल यांनी.
इंग्रजांची मूळ संस्कृति ती व्यापाराची. समुद्र हटवून धक्का बांधावा तर पैसा त्यांच्या हाताशी नाही. 'साहसे वसती लक्ष्मी" ही म्हण सार्थ करित भाऊंनी इंग्रजांकडून परवानगी मिळवली व हा धक्का स्वखर्चाने बांधला. म्हणून इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने धक्क्याचा वापर व माल चढ़-उतरविण्याचा ठेका कित्येक वर्षे भाऊला दिला त्यामुळे 'भाऊचा धक्का" हे वाक्य लोकांमध्यें प्रचारात आले. पण इंग्रज मंडळी मात्र त्याचा उल्लेख 'फेरी व्हार्फ" असा करित.
सन् 1835च्या दरम्यान भाऊ ईस्ट इंडिया कंपनीच्या गन कॅरिएज फेक्टरी (तोपखाना) मध्यें कारकून म्हणून काम करित होते. हुशार, हुन्नरी व इंग्रजी भाषेत निपुण भाऊंचे कर्तृत्व बघून तोपखान्याच्या अधिकारी कॅप्टन रसेलने त्यांना मजूरांकरिता उपहारगृह सुरु करण्यास सांगितले व भाऊंच्या उद्योगाची मुहुर्तमेढ़ रोवली गेली. त्या आधी त्यांनी एका मजूराला कठोर शिक्षेपासून वाचविल्यामुळे ते मजूरांमध्ये लोकप्रिय झालेच होते. मग त्यांनी क्लार्कीसोडून बिल्डर बनण्याचे ठरवून चिंचबंदर ते मस्जिदबंदरहून क्रॉफर्डमार्केट पर्यन्तची समुद्रसपाटीच्या पूर्वे पर्यन्त 10 ते 15 फूट खोल पाण्याखालची जमीन भरणीसाठी व रस्ता बांधणीसाठी कंपनी सरकारकडून मागितली व सर्वखर्च स्वतः करण्याचे मान्य केले. या मुळे प्रवाशांना तर हे सोयीचे ठरेलच पण शहराचा व्यापार देखील सुधारेल.
सरकारकरिता हा प्रस्ताव नक्कीच फायदाचा होता. कंपनी सरकारने उदात्त हेतूने नव्हे तर स्वतःची अडचण ओळखून लक्ष्मण हरिश्चन्द्रला परवानगी मोठ्या आनंदाने दिली होती. याबाबतीत कलेक्टरने गव्हर्नरला केलेली शिफारस अत्यंत बोलकी आहे. 'लक्ष्मण हरिश्चन्द्रनी सुचविलेल्या सुधारणा सार्वजनिक हिताच्या खऱ्याच. शिवाय सध्याच्या समुद्रपट्टीवर चिकटलेली घरे व दाट वस्तीमुळे कस्टम खात्याला दाद न देता आखाती देशांबरोबर एतद्देशीयांचे जे तस्करी (स्मगलिंग) चालते त्याला ह्या भरणीमुळे आळा बसेल." यावरुन कळते की त्याकाळात देखील आखाती देशांबरोबर स्मगलिंग सारखे गुन्हे एतद्देशीय करित असत. कंपनी सरकारने स्वतःचे हित बघता ताबडतोब भाऊंना भरणी व रस्ता बांधणीच्या कामाची परवानगी दिली. सर्व खर्च भाऊ करणार असल्यामुळे मोबदल्यात नवीन जागेचा उपयोग माल चढ़-उतरविण्याचा मक्ता 50 वर्षे मोफत उपभोगात आणण्याकरिता त्यांना दिला.
भाऊ मोठे धूर्त, हुशार आणि धाडसी असे मराठी माणूस असून त्यांनी आधी भरती-ओहोटीचा अभ्यास केला आणि सोयिस्कर जागा निवडली. याच्या कित्येक वर्षानंतर पोर्ट ट्रस्टच्या अभियंत्यांना या कल्पना सूचल्या. भाऊंनी कॅप्टन रसेलच्या साह्याने आरखडा सादर केला. परवानगी मिळताच सपाट्याने काम सुरु केले. व्यापारी मनोवृत्तीच्या भाऊंना एक अफाट कल्पना सूचली की जर कचरा भरणीकरिता उपयोगात आणला तर त्याचा लगदा जमीनीस चिकटेल व भरणी स्वस्त व सोयिस्कर देखील होईल. त्यांनी नगरपालिकेचा कचरापट्टीचा मक्ता घेऊन सर्व समुद्रखाडी भरुन काढ़ली व लाखोंनी खर्च वाचविला. पण झोपडपट्टीतील मुसलमान विरोधात उभे राहिले. आणि काझी शहाबुद्दीन आदि रहिवाशांनी नवीन होणाऱ्या मोकळ्या जागेमुळे स्मगलिंगला आळा बसेल म्हणून भाऊंचे हे काम सरकारकडून थांबविण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने मात्र साह्य केले.
त्या काळात मोटारी नव्हत्या, मशीनी नव्हत्या, वीज देखील नव्हती अशाकाळात अशी अफाट कल्पना सूचणे व त्याकरिता अर्ज करणे अत्यंत धाडसीच म्हणावे लागेल ते धाडस भाऊंनी करुन दाखविले. लोकांनी त्यांना अशा अफाट धाडसाकरिता वेड्यात काढ़ले पण त्यांनी यशस्वी होऊन दाखविले. चार-पांच वर्षात बंदर पूर्ण तयार झाले. त्यांनी वखारी बांधल्या व हिंदुस्थानाचे वखारीयुक्त पहिले बंदर अस्तित्वात आले.
या भाऊच्या धक्क्याशी कोंकणी लोकांच्या भावना निगडित झाल्या. त्यात काही गोड तर काही कडू. रस्ते वाहतूकीच्या एस.टी. चा विस्तार झालेला नव्हता, तेव्हा कोकणाच्या लोकांना जलवाहतूकी शिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळात तुकाराम, रामदास, रोहिदास अशी संतांची नावे असलेल्या बोटी चालत असत. सेंट झेविअर, सेंट अंथनी अशी ख्रिस्ती संतांची नावे असणाऱ्या, तर हिरावती, चंपावती, पद्मावती अशी सुंदर स्त्रीयांची नावे धारण करणाऱ्या बोटी खासगी कंपन्यांच्या चालत असत.
तात्कालिक गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रान्टने ब्रिटेनला जाण्यापूर्वी नव्या जागेची पाहणी केली होती. त्यावेळेस त्याने प्रसन्न होऊन टिपणामध्ये लिहले होते - 'ळ ुरी र्ीीीिीळूशव रीं ींहश िीेसीशीी ुहळलह हरी लशशप ारवश ळप ारसपळषळलळशपीं र्ीीशर्षीश्र ुेीज्ञ, ींहश ुहेश्रश ेष ींहश ीशींरळपळपस ुरश्रश्र हरी लशशप लेाश्रिशींशव, ींहश लरीळप षेी ीशलशर्ळींळपस ींहश लेरींी हरी लशशप िीशरिीशव, ळ लरपपेीं ींेे हळसहश्रू िीरळीश ींहश शपशीसू । र्िीलश्रळल ीळिीळीं ेष 'ङरुारप' ळप र्ीपवशीींरज्ञळपस र ुेीज्ञ ेष ींहळी ारसपर्ळींीवश.'
लक्ष्मण हरिश्चन्द्र अजिंक्यनी मशीद बंदर ते मीटमार्केट (फुले मंडई) मधील जागेला नव्या येणाऱ्या गव्हर्नर सर जेम्स कॉरनक याचे नाव सुचविले ते सर ग्रांटने मान्य केले आणि तेव्हा पासूनच ती जागा कॉरनाक बंदर म्हणून प्रसिद्धिस आली. नवीन लीज कराराने भाऊंचे काम अवाढ़व्य वाढ़ले. मर्यादित गंगाजळीमुळे सरकार कडून कर्ज घ्यावे लागले. सरकारच्या चक्रवाढ़ी व्याजाने ते सरकारच्या जाळ्यात पुरते अडकले पण कसेबसे कायद्याच्या कचाट्यातून सुटले तरी देखील त्यांचे पूर्वीचे बॉस आणि आता मित्र कॅप्टन रसेल मात्र नौकरीतून बडतर्फ केले गेले. हीच जोडगोळी भाऊरसेल ऊर्फ भाऊरसूल म्हणून प्रसिद्ध होती. 19 ऑक्टोबर 1858 मध्यें त्यांचे निधन झाले.
आकुरली (कांदीवली पूर्व), चिंचवली (मलाड पश्चिम) आणि दिंडोशी (गोरेगांव पूर्व) या तीन गावांची खोती हक्क ईस्ट इंडिया कंपनीकडून भाऊंनी घेतले होते. पण आज ह्या घराण्याच्या मालकीची अशी टीचभर जागा देखील ह्या विस्तीर्ण मुंबईत नाही. मुंबई महानगरपालिकेने अवश्य कॉरनक बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यामधील चौकाला भाऊ लक्ष्मण अजिंक्य चौक असे नाव देऊन त्यांची स्मृति जागी ठेवली आहे. आता हेच मुंबईच्या मराठी-कोंकणी लोकांच्या पुढ़ील अनेक पिढ्यांना स्फूर्ति देणारे भाऊंचे स्मारक आहे. भाऊच्या धक्क्याची ऐतिहासिक कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखाविभागात उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment